‘आज रात कुछ बडा होने वाला है!’, पंतप्रधान मोदींचे मध्यरात्री ट्विट अन् काही क्षणांतच वांगचूक यांच्या उपोषणाची सांगता; अभिजित दीपके मात्र धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर ठाम

नवी दिल्ली (खास बातमीदार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नीट पेपरफुटी प्रकरणातील दोषींविरुद्ध कारवाईच्या मागणीसाठी आंदोलनाचा झेंडा उचलून उपोषणास बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी तब्बल २६ दिवसांनंतर गुरुवारी (दि. २३) मध्यरात्रीनंतर अखेर आपले उपोषण मागे घेतले. मध्यरात्री 1.30 वाजता केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर सोनम वांगचुक यांनी उपोषण थांबवण्याचा निर्णय जाहीर केला. उपोषण थांबवत असल्याची घोषणा स्वत: वांगचुक यांनी एक्सवर पोस्ट करून केली. महत्त्वाचे म्हणजे वांगचूक यांनी उपोषण सोडण्याच्या अवघे काही मिनिट आधी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’वर ‘आज रात कुछ बडा होने वाला है’ अशी पोस्ट करीत या संदर्भातील संकेत दिले होते.
दरम्यान, सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतले असले तरी दुसरीकडे कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी) मात्र अजूनही आंदोलनावर ठाम आहेत. वांगचुक यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर सीजेपीजे संस्थापक अभिजीत दीपके यांनी प्रतिक्रिया देत २६ दिवसांनी वांगचुक यांनी उपोषण मागे घेतल्याने आम्हाला मोठा दिलासा मिळाल्याचे म्हटले. ‘सोनम सर, आपल्या असामान्य धैर्याला आणि त्यागाला मनापासून सलाम. स्वतःचा जीव धोक्यात घालून आपण संपूर्ण देशाच्या विवेकाला जागृत केले. आपले जीवन या देशासाठी अत्यंत मौल्यवान आहे, असे दीपके यांनी म्हटले आहे. सोबतच त्यांनी सीजेपीचे जंतर-मंतर येथे सुरू असलेले आंदोलन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यापर्यंत सुरूच राहील, असेही दीपके यांनी जाहीर केले.
दरम्यान, केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा व जितेंद्र सिंह यांनी रुग्णालयात वांगचुक यांची भेट घेतली. त्यांनी सरकारने मान्य केलेल्या मागण्यांची माहिती वांगचूक यांना दिली. यानंतर वांगचूक यांनी उपोषण मागे घेतले.
केंद्र सरकारने मान्य केलेल्या अटी…
- २० जुलै रोजी संसदेवर मोर्चा काढणाऱ्या विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल केला जाणार नाही.
- परीक्षेसंदर्भात पेपरफुटी व शिक्षण प्रणालीतील सुधारणांवर संसदेत चचेंस सरकार तयार आहे.
- नीट पेपरफुटीमुळे आत्महत्या केलेल्या मुलांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्याचा सरकार विचार करेल.
२६दिवसांपासूनसुरूहोते उपोषण
विविध स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या आणि शिक्षण व्यवस्थेत उत्तरदायित्वाची मागणी करणाऱ्या विद्यार्थी व तरुणांच्या चळवळीला त्यांनी पाठिंबा देत सोनम वांगचुक यांनी २८ जून रोजी आमरण उपोषणाला सुरूवात केली होती. शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता, उत्तरदायित्व निश्चित करणे आणि दोषींवर कठोर कारवाईची त्यांची मागणी होती. १८ जुलै रोजी त्यांची प्रकृती खालावू लागल्याने दिल्ली पोलिसांनी त्यांना सफदरजंग रुग्णालयात नेले होते. तेथून दोन दिवसांपूर्वी न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना मेदांता या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले होते. अखेर गुरुवारी मध्यरात्री त्यांनी सरकारच्या आश्वासनांनंतर उपोषण मागे घेतले.
