नंदुरबारच्या प्रकल्पग्रस्तांच्या जमिनींच्या गैरव्यवहाराची दोन महिन्यांत चौकशी; मंत्री ॲड. जयस्वाल यांची विधानसभेत घोषणा

मुंबई (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदूरबार जिल्ह्यातील नर्मदा बचाव आंदोलनातील सक्रिय कार्यकर्त्याने शासनाकडून आर्थिक मोबदला व पुनर्वसनाचा लाभ घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, या प्रकरणाची पुढील दोन महिन्यात सखोल चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी विधानसभेत केली.
विधानसभा सदस्य आमश्या पाडवी यांनी याविषयीसंदर्भात विधानसभेत लक्षवेधी उपस्थित केली होती. नर्मदा बचाव आंदोलनात सक्रीयपणे काम करणार्या एका कार्यकर्त्याने आदिवासींची जमीन लाटून त्याचा मोबदलाही उचलला होता. सरकार या प्रकरणात काय कारवाई करणार आहे, असा प्रश्न आ. आमश्या पाडवी यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून विचारला होता.
यावर राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल म्हणाले की, नर्मदा बचाव आंदोलनातील प्रकल्पग्रस्तांच्या बाबतीत शासनाने शासन निर्णय ४ फेब्रुवारी २००४ व २० सप्टेंबर २००४ नुसार कार्यवाही केलेली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील गमन येथील हुन्या रूपा वसावे यांच्यासंदर्भात सविस्तर तक्रार दाखल करावी. त्याची चौकशी पुढील दोन महिन्यात करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी नमूद केले.



