पै-पै जमा करून उभा केलेला संसार क्षणार्धात खाक; मजुराचे घर आगीत भस्मसात, ८० हजारांची रोकडही जळाली, नवापूर तालुक्यातील भीषण दुर्घटना
नवापूर (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : वर्षानुवर्षे रक्ताचे पाणी करून उभा केलेला संसार घराला लागलेल्या आगीत क्षणार्धात खाक झाल्याची दुर्दैवी घटना नवापूर तालुक्यातील शेही गावात घडली. मजुराचे संपूर्ण कुटुंब वडफळी येथे आदिमाता देवीच्या दर्शनासाठी गेलेले असताना ही आग घडल्याने सुदैवाने जीवितहानी टळली. मात्र, आगीत घरातील जवळपास सर्वच संसारपयोगी वस्तू जळून खाक झाल्या.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरत्या जेठ्या गावित असे आगीत घर भक्ष्यस्थानी पडलेल्या दुर्दैवी मजुराचे नाव आहे. गावित यांच्या घराला अचाकन आग लागली. या आगीने अवघ्या काही मिनिटांतच रौद्ररूप धारण केले आणि त्यात अत्यावश्यक कागदपत्रे, कपडे, धान्यसाठा तसेच ८० हजार रुपयांची रोकडही जळून खाक झाली.
आगीच्या घटनेची माहिती मिळताच शेहीतील गावकर्यांनी तत्काळ घटनास्थळाकडे धाव घेत हाती येईल त्या साहित्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आणि स्थानिकांनी बराच वेळ प्रयत्न केल्यानंतर त्यांना आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. मात्र, तोपर्यंत या मजुराचा संसार अक्षरश: उघड्यावर आला होता.



