भांडण सोडवायला गेला अन् जीव गमावून बसला; पाय घसरून पडल्याने तरुणाचा मृत्यू; तळोदा तालुक्यातील हृदयद्रावक घटना

तळोदा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : भांडण सोडवायला गेलेल्या २९ वर्षीय तरुणाचा पाय घसरून पडल्यानंतर डोक्याला मार लागून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना तळोदा तालुक्यातील प्रतापपूर येथे उघडकीस आली आहे. रघुनाथ सन्या मोरे असे या दुर्दैवी तरुणाचे नाव असून, गुरुवारी (दि. २६) रात्री सुमारे ८.२० वाजता ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतापपूर गावात गुरुवारी संध्याकाळच्या वेळी रंजित मोरे याच्या घरासमोर रंजित व कुंभा, पिना, संजय यांच्या किरकोळ मुद्द्यावरून वाद सुरू होता. रघुनाथ हा वाद सोडविण्यासाठी जात असताना रस्त्यावर त्याचा पाय अचानक घसरला. त्यामुळे तो खाली पडून गंभीर जखमी झाला व जागीच बेशुद्ध पडला. त्यानंतर त्याला तत्काळ तळोदा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल राजपूत यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.
या घटनेची माहिती रघुनाथचे वडील सन्या धनजी मोरे यांनी तळोदा पोलीस ठाणे येथे दिली. यावरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अखीलखान पठाण करीत आहेत.



