नंदुरबार जिल्हा

जिल्ह्यात अवघ्‍या १० तासात दोन अपघात; नियोजित नवरदेवासह तीन दुचाकीस्वार तरुणांचा मृत्यू; एका अपघातानंतर संतप्त गावकऱ्यांनी चारचाकी वाहन जाळले

नंदुरबार / अक्कलकुवा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : ‘दुचाकीस्वारांच्या अपघातांचा जिल्हा’ अशी नवी ओळख निर्माण होऊ पाहणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यात दुचाकीस्वारांच्या अपघाताची मालिका थांबायचे नाव घेत नाही. जिल्ह्यात अवघ्या १० तासांच्‍या अंतराने दोन अपघात झाले असून, यात तीन तरुणांना प्राण गमवावा लागला आहे. यामध्ये अवघ्या दहा दिवसांवर लग्न सोहळा असलेल्या एका नियोजित नवरदेवाचा समावेश आहे. यातील एक अपघात नंदुरबार ते धानोरा रस्त्यावर तर दुसरा अपघात अक्कलकुवा ते मोलगीदरम्यान झाला.
नंदुरबार- धानोरा मार्गावर दोन तरुणांचा मृत्यू
नंदुरबार–धानोरा मार्गावरील लोय फाटा ते वेळावद फाटादरम्यान गुरुवारी सकाळी सुमारे १० वाजेच्या सुमारास भरधाव चारचाकीने मोटारसायकलला दिलेल्या जोरदार धडकेत दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांपैकी एका तरुणाचा अवघ्या दहा दिवसांनी विवाह होणार होता.
सदर ठिकाणी सध्या रस्त्याचे काम सुरू असून, संबंधित ठेकेदाराने सूचनाफलक, दिशादर्शक चिन्हे किंवा आवश्यक सुरक्षाव्यवस्था उभारली नसल्याने वारंवार अपघात घडत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
नाजील जमीन पठाण (रा. नवापूर) याने त्याच्या ताब्यातील महिंद्रा झायलो (क्र. जीजे-१६-बीबी-१५५२) भरधाव आणि निष्काळजीपणे चालवत समोरून येणाऱ्या मोटारसायकलला (क्र. जीजे-०५-बीआर-०४७२) जबर धडक दिली. ही धडक इतकी जबर होती की दुचाकीवरील दोन्ही युवक गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच धानोरा परिसरातील रहिवाशी व सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पाडवी यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णवाहिकेद्वारे नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना रोहित आप्पा भिल (२२) आणि साजन संजय भिल (१८, दोघेही रा. शिंदे ता. जि. नंदुरबार) यांचा मृत्‍यू झाला. हृदयद्रावक बाब म्हणजे रोहित भिल याचा विवाह अवघ्या दहा दिवसांनी होणार होता. लग्नाच्या आनंदसोहळ्याची तयारी सुरू असताना तो मित्रासह नातेवाईकांकडे पत्रिका वाटण्यासाठी निघाला होता. मात्र, मध्‍येच नियतीने त्याच्यावरच घाला घातला.
या भीषण घटनेनंतर नागरिकांनी अपघातास कारणीभूत चारचाकी वाहनाला रस्त्यावरच आग लावून संताप व्यक्त केला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात आप्पा भामट भिल (४६, रा. शिंदे) यांच्या फिर्यादीवरून चारचाकी वाहन चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्‍या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी जगन वळवी पुढील तपास करीत आहेत.
अक्‍कलकुवा तालुक्‍यात आणखी एका तरुणाचा बळी
या आधीचा अपघात १० तास आधी बुधवारी रात्री पावणेबारा वाजेच्या सुमारास अक्कलकुवा ते मुलगी रस्त्यावर ढाण्याविहीर फाट्याजवळ घडला. अविनाश अनवर तडवी (१९, रा. विरपूर, ता. अक्कलकुवा) हा तरुण रात्री ९ वाजेच्‍या सुमारास कुटुंबीयांना देवमोगरा पुनर्वसन येथे लग्नाच्या हळदीच्या कार्यक्रमाला जाऊन येतो असे सांगून दुचाकीवरून (क्र. जीजे ०५ एफके ३७६६) गेला होता. आमलीबारी येथून विरपुरकडे परत येताना आयशर वाहनाने (क्र. जीजे १९ वाय ९२९९) त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात अविनाशच्या शरीरासह डोक्याला गंभीर दुखापती होऊन तो जागीच गतप्राण झाला.
याप्रकरणी आयशर वाहनाच्या अज्ञात चालकाविरोधात अनवर दशरथ तडवी यांच्या फिर्यादीवरून अक्कलकुवा पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक सारंग नवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ कृष्णा गावित हे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button