अक्कलकुवाच्या डोगरीपाड्यात ढिशुम ढिशुम; रस्ता मोठा करू नको, म्हणताच तुटून पडले पाच जण; तिघे जखमी
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : हातपंपाची मोटार काढण्यासाठी जाणाऱ्या वाहनाला रस्ता मोठा करण्याच्या वादातून जमावाने केलेल्या मारहाणीत तीन जण जखमी झाल्याची घटना अक्कलकुवा तालुक्यातील डोगरीपाडा येथे घडली. या प्रकरणी जखमींपैकी जात्रीबाई बिला वळवी यांनी तक्रार दाखल केली. हे गाव अक्कलकुवा तालुक्यात असले तरी त्याचे पोस्ट तळोदा असल्याने या प्रकरणी पाच जणांविरोधात तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डोगरीपाडा येथील जयसिंग दोहऱ्या वसावे हातपंपाची मोटार काढण्यासाठी जाणाऱ्या वाहनासाठी रस्ता तयार करीत होते. त्याचवेळी तेथे उपस्थित असलेल्या जात्रीबाई वळवी यांनी त्यांना ‘रस्ता मोठा करू नको’ अशी सूचना केली. मात्र, ही सूचना जयसिंग यांना खटकली. यातून दोघांमध्ये वाद सुरु झाला. काही वेळातच हा दोन्ही कुटुंबांमध्ये सुरु झाला आणि वाढत गेला.
थोड्याच वेळात वसावे कुटुंबातील पाच जणांनी जात्रीबाई आणि त्यांच्या कुटुंबियांना मारहाण सुरु केली. यात जात्रीबाई बिला वळवी, मनीष बिला वळवी आणि दिलीप बिला वळवी (सर्व रा. डोगरीपाडा) हे तिघे जखमी झाले. यानंतर जात्रीबाई वळवी यांच्या फिर्यादीवरून जयसिंग दोहऱ्या वसावे, महेंद्र हूपड्या वसावे, रुपल्या भीक वसावे, अजय हूपड्या वसावे, रामसिंग दोहऱ्या वसावे (सर्व रा. डोगरीपाडा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. जमादार संजय नाईक या प्रकरणाचा तपास करीत आहेत.



