तळोद्याच्या विहीरमाळमध्ये दोन गट परस्परांवर तुटून पडले; वादाचे रूपांतर हाणामारीत; पाच जखमी; १४ जणांवर गुन्हा
तळोदा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : चांदीचे दागिने मागितल्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना तळोदा तालुक्यातील विहीरमाळ (बेडवाईपाडा) येथे घडली. या प्रकरणी दोन्ही गटांकडून परस्परांविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या असून, त्यानुसार एकूण १४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजय सायसिंग वळवी याने चांदीच्या दागिन्यांची मागणी केल्यानंतर याचा राग आल्याने वागरा डेमश्या ठाकरे याने काही लोकांना एकत्र करून विजय वळवी व खारकीबाई वळवी या दोघांना मारहाण केली. यात हे आई व मुलगा जखमी झाले. तर यानंतर विजय वळवी यांच्या फिर्यादीवरून वागरा डेमश्या ठाकरे, कालूसिंग डेमश्या ठाकरे यांच्यासह इतर ७ जणांविरोधात तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश अहिरे करीत आहेत.
यानंतर किसन डेमश्या ठाकरे यांनी विजय सायसिंग वळवी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. विजय वळवी याने भांडणाची कुरापत काढून काही लोकांना एकत्र करीत आपल्यासह कुटुंबियांना मारहाण केल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. यात किसन ठाकरे, वागरा ठाकरे, आसलीबाई वागरा ठाकरे हे जखमी झाल्याचे नमूद केले आहे. या फिर्यादीवरून विजय वळवी, वनसिंग वळवी, अशोक वळवी, खारकीबाई वळवी, नीता वळवी यांच्याविरोधात तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल राजू जगताप करीत आहेत.



