तळोद्यात २४ तासांत दुसरा खून; ५७ वर्षीय व्यक्तीला डोक्यावर प्रहार करीत गळा दाबून संपवले
तळोदा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : तालुक्यातील अणेश बुधावल गावात तरुणाच्या खुनाची घटना उघडकीस येऊन १२ तासही उलटत नाही तोच तालुक्यातीलच सतोना शेतशिवारात आणखी एक खून उघडकीस आला आहे. या ठिकाणी गुजरातच्या तापी जिल्ह्यात राहणार्या ५७ वर्षीय व्यक्तीचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह सापडला असून, या व्यक्तीला याच ठिकाणी मारण्यात आले की अन्य ठिकाणी खून करून त्याचा मृतदेह सतोना शिवारात आणून टाकला, याचा तपास तळोदा पोलिस करीत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खून झालेल्या व्यक्तीचे नाव कांतिलाल मोतीराव वळवी (५७, रा. बालंबा, ता. कुकरमुंडा, जि. तापी, गुजरात) असे आहे. २५ मार्च रोजी तळोदा तालुक्यातील सतोना शेतशिवारातील विनोद मंगा वळवी यांच्या गट क्र. ३७ मधील शेतात एका व्यक्तीचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह आढळला होता. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केल्यानंतर या व्यक्तीच्या डोक्यावर अज्ञात वस्तूने प्रहार करून नंतर दोरीने गळा आवळून त्याला मारून टाकण्यात आल्याचे स्पष्ट दिसून आले. पोलिसांनी तत्काळ मृतदेह ताब्यात घेऊन शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी रवाना केला.
या काळात या व्यक्तीचा याच काळात या व्यक्तीचा मुलगा महेंद्र कांतिलाल वळवी (३०) हा कामानिमित्त गुजरातमध्ये गेलेला होता. या घटनेची माहिती मिळताच त्याने तत्काळ तळोदाकडे धाव घेत पोलिस ठाणे गाठली. त्याने या प्रकरणात फिर्याद दाखल केली असून, त्यात ही घटना २५ मार्चच्या सकाळी ९.१५ ते २६ मार्चच्या सकाळी १० वाजेच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने कांतिलाल वळवी यांचा खून केल्याचे म्हटले आहे. यावरून अज्ञात आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून, या प्रकरणी पोलिस निरीक्षक राजन मोरे अधिक तपास करीत आहेत.
कांतिलाल वळवी कोणत्या कामासाठी आणि कधी तळोदा तालुक्यात आले होते, त्यांचा खून येथे आल्यानंतर करण्यात आला की आधीच अन्यत्र मारून त्यांना सतोना शिवारात आणून टाकले या दृष्टीने पोलिसांचा तपास सुरू असून, अज्ञात आरोपीचा तपास घेतला जात असल्याचे सांगण्यात आले.
२४ तासांत दुसरी घटना
दरम्यान, २४ मार्चला संध्याकाळी गणेश बुधावल गावात रवींद्र पुष्पेंद्र वळवी या २२ वर्षीय तरुणाच्या खुनाची घटना घडली होती. त्यानंतर अवघ्या १२-१४ तासांच्या अंतराने तालुक्यात आणखी एक खुनाची घटना उघडकीस आल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.



