चिंता सोडा : सध्या पडत नसला तरी लवकरच पाऊस धो-धो बरसणार, दुष्काळाचे चित्र नाहीच; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांच्याकडून शेतकर्यांना दिलासा

नंदुरबार (खास बातमीदार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : राज्यात पावसाळ्याचा हंगाम सुरू होऊन १० दिवस उलटलेड असले तरी राज्याच्या अनेक भागात अद्याप थेंबभर देखील पाऊस पडलेला नाही. यामुळे शेतकरी चिंतेत असले तरी हवामान तज्ज्ञ पंजाबराव डंख यांनी शेतकर्यांना धीर न सोडण्याचा सल्ला दिला आहे. जूनअखेरीस राज्यात चांगल्या पावसाला सुरूवात होईल. १५ जुलैपर्यंत पाऊस धो-धो बरसेल असे सांगत डख यांनी यंदा दुष्काळ पडणार नसल्याचे स्पष्ट करून बळीराजाला चिंता न करण्याचा सल्ला दिला आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही मान्सून कोकणात वेळीच दाखल झाला असला तरी गेल्या दहा दिवसांपासून तो तेथेच अडकून पडला आहे. ‘अल निनो’च्या प्रभावाने हे घडत असल्याचे सांगण्यात येते. मात्र, यामुळे राज्याच्या अनेक भागांत अद्याप पावसाला सुरूवात झालेली नसल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. अनेक भागांत पेरण्याही खोळंबल्या असून, शेतकर्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहे. हे चित्र चिंता वाढवणारे असताना हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी मात्र शेतकर्यांना पावसाच्या अनुषंगाने तसूभरही चिंता न करण्याचा सल्ला दिला आहे.
जूनच्या शेवटच्या आठवड्यात येणार पाऊस
सध्या पाऊस पडत नसताना दुसऱ्या बाजूला पंजाबराव डख यांनी दिलासा देणारा अंदाज वर्तविला आहे. यंदा भरपूर पाऊस पडणार असून, शेतकऱ्यांनी घाबरुन जाण्याची गरज नाही, असे डख यांनी म्हटले आहे. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जोरदार पाऊस येईल. त्यानंतर पेरण्या सुरु होतील. काही जणांच्या तरीही पेरण्या राहिल्या तरी १० ते १५ जुलैच्या दरम्यानही तुफान पाऊस येईल. तेव्हा राहिलेल्या पेरण्या करता येतील. पण दुष्काळ वगैरे पडणार नाही, असे डख यांनी ठामपणे सांगितले. एवढेच नाही तर राज्यात यंदा दुष्काळ पडणार नाही. याउलट यंदाचे वर्ष शेतकऱ्यांसाठी सर्वात चांगले राहील, असेही डख यांनी म्हटले आहे.



