नंदुरबार जिल्हा ‘पालका’विना; नियुक्तीच्या २५ दिवसानंतरही पदभार स्वीकारण्यास हसन मुश्रीफांना वेळ मिळेना

नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : पालकमंत्रीपदी नियुक्ती होऊनही नंदुरबार जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारण्यास राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांना वेळच मिळाला नसल्याची माहिती पुढे आली आहे. महत्त्वाचे म्हणजे इच्छा नसतानाही नंदुरबारच्या पालकमंत्री पदाची माळ गळ्यात टाकल्याने मुश्रीफ नाराज असून, त्यामुळेच त्यांनी अद्याप या पदाची जबाबदारी स्वीकारली नसल्याचीही माहिती पुढे आली आहे.
राज्य सरकारने १८ मार्च रोजी नंदुरबार जिल्ह्याचे पालक मंत्री म्हणून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन सकिना मियालाल मुश्रीफ यांची नियुक्ती केली होती. मात्र दुसऱ्याच दिवशी त्यांनी ‘ दुसरा कोणी नेता जबाबदारी घेत नाही तोपर्यंतच मी नंदुरबारचा पालकमंत्री म्हणून कार्यरत राहील’, असे सांगत आपल्याला नंदुरबारचा पालकमंत्री होण्यामध्ये काहीही रस नसल्याचा गौप्यस्फोट केला होता. त्याचवेळी मुश्रीफ नंदुरबारचे पालकत्व स्वीकारणार की नाही, अशी शंका नंदुरबारकरांच्या मनात निर्माण झाली होती. आता २५ दिवसानंतरही मुश्रीफ यांनी हे पद स्वीकारलेले नसल्याने नंदुरबारकरांची शंका खरी ठरल्याचे मानले जाते. मुश्रीफ यांचा सगळा इंटरेस्ट त्यांचा गृह जिल्हा असलेल्या कोल्हापूर मध्ये असून, कोल्हापूर ते नंदुरबार असा ६०० कि. मी.चा नियमित प्रवास करण्याची इच्छा नसल्याने मुश्रीफ यांनी आतापर्यंत नंदुरबारच्या पालकमंत्री पदाचा पदभार स्वीकारला नसल्याची माहितीही समोर आली आहे.
पालकमंत्रीपद शिवसेनेला?
महायुतीच्या फॉर्म्युल्यानुसार नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे राष्ट्रवादी काँग्रेसकडे (अजित पवार गट) आहे. याआधी हे पद याच पक्षाचे माणिकराव कोकाटे यांच्याकडे होते. त्यांच्या राजीनाम्यानंतर मुश्रीफ यांच्याकडे हे पद सोपवण्यात आले. मात्र त्यांनी अजूनही या पदाचा पदभार स्वीकारलेला नाही. दरम्यान कोकाटे यांच्या राजीनाम्यानंतर नंदुरबारचे पालकमंत्री पद मुश्रीफ यांची नियुक्ती होईपर्यंत म्हणजे चार महिने रिक्त होते. त्या काळात जिल्ह्याचे पालकमंत्री पद आपल्याकडे यावे यासाठी शिवसेनेकडून (शिंदे गट) प्रयत्नही केले गेले. परंतु त्यात त्यांना यश आले नव्हते. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि नंदुरबारचे पालकमंत्री पद हा काळमेळ जुळत नसल्याने आणि मुस्लिम यांनी आतापर्यंत हे पद न स्वीकारल्याने आता पुन्हा जिल्ह्याचे पालकमंत्री पद आपल्याकडे घेण्यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न सुरू झाले असून, यात त्यांना कितपत यश मिळते हे पाहणे रंजक ठरणार आहे.



