सावधान, काळजी घ्या : कडक उन, टाकेल आयुष्य संपवून; उन्हाच्या कडाक्यामुळे तीन अवयव निकामी होण्याचा धोका!

मुंबई (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : देशात आलेली उष्णतेची लाट अनेकांच्या जीवावर उठली असून, राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यात आतापर्यंत उष्माघाताने अनेकांचा बळी घेतला आहे. त्यातच आता वाढत्या उष्णतेमुळे केवळ थकवा वाढण्याचा शरीरातील तीन महत्त्वाच्या अवयवांना गंभीर इजा होऊ शकण्याचा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.
सध्या सुरू असलेली उष्णतेची लाट आजारांची पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींसाठी अधिक घातक ठरू शकते, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. विशेषता हृदय मेंदू आणि किडनी या तीन अवयवांना वाढत्या उन्हापासून सर्वाधिक धोका असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
उष्णतेच्या लाटेत माणसाच्या शरीराचे तापमान मोठ्या प्रमाणात वाढते. या काळात शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी रक्ताचा प्रवाह त्वचेकडे वळवला जातो. यामुळे हृदयाला रक्ताचे पंपिंग करण्यासाठी अधिकची मेहनत घ्यावी लागते. वाढत्या उन्हात शरीराचे डिहायड्रेशन होऊन त्यामुळे रक्त घट्ट होते आणि हृदयाचा धक्का बसण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे वाढत्या उन्हाच्या काळात रक्तदाबाचा त्रास असलेल्या रुग्णांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
तसेच वाढत्या उष्णतेमुळे माणसाच्या शरीराचे तापमान ४० अंश सेल्सियसच्या वर जाते त्यावेळी उष्माघाताचा धोका निर्माण होतो. या काळात मेंदूचे कार्य विस्कळीत होऊन चक्कर येणे, मानसिक गोंधळ, तीव्र डोकेदुखी किंवा बेशुद्ध पडणे अशी लक्षणे दिसू लागतात. असा त्रास होणाऱ्या व्यक्तीला तत्काळ उपचार न मिळाल्यास त्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो, असा धोकाही डॉक्टरांनी सांगितला आहे.
किडनीलाही धोका
प्रचंड उष्णतेमुळे माणसाच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. शरीराचे तापमान वाढल्यास मूत्रपिंड (किडनी) शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास असमर्थ ठरते. यातून किडनी निकामी करण्याचा धोका वाढतो असा इशाराही डॉक्टरांनी दिला आहे.
शरीराचे तापमान ठेवा ३७ अंशांच्या आत
दरम्यान माणसाच्या शरीराचे तापमान ४२ अंशांच्या आसपास पोहोचते, त्यावेळी शरीरातील रक्त कापू लागते आणि रक्तातील प्रोटिन्स उकळायला सुरुवात होते. स्नायू कडक होऊ लागतात आणि त्यातही श्वास घेण्यासाठी लागणारे स्नायू निकामी होतात. रक्तातील पाणी कमी झाल्यामुळे रक्त घट्ट होते. हा सर्व धोका टाळण्यासाठी ठराविक अंतराने थोडे थोडे पाणी पीत राहावे. जेणेकरून शरीराचे तापमान ३७ अंशांच्या जवळपास राहू शकते आणि जीवाला असलेला धोका कमी होऊ शकतो असा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे.



