State News : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; आता मिळणार ५८ टक्के महागाई भत्ता; आधीच्या तुलनेत ३ टक्क्यांची वाढ
मुंबई (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : राज्य सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना गुड न्यूज दिली आहे. सरकारने शासकीय आणि इतर पात्र शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३ टक्क्यांनी वाढवून ५८ टक्के केला आहे. ही वाढ जुलै २०२५ पासून लागू करण्यात आली असून, वित्त राज्यमंत्री डॉ. आशिष जयस्वाल यांनी तशी घोषणा विधान परिषदेत केली. दरम्यान, राज्य सरकारच्या या निर्णयाचा फायदा ५ लाख १६ हजार विद्यमान सरकारी कर्मचारी आणि ८ लाख ७६ हजार निवृत्ती वेतनधारकांना होणार आहे.
जुलै २०२५ पासून लागू झालेल्या या वाढीव महागाई भत्त्याची जुलै ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीतील फरकाची रक्कम सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना येत्या मार्च महिन्यात येणाऱ्या गुढीपाडव्याचा मुहूर्त साधून अदा केली जाणार आहे. तर नोव्हेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीतील थकबाकीची रक्कम अदा करण्याबाबत राज्य सरकार स्वतंत्र आदेश काढणार आहे, अशी माहिती डॉ. जयस्वाल यांनी यावेळी दिली.



