गावकारभारी होण्यासाठी आतापर्यंत ४९ जण मैदानात; सरपंच पदासाठी २३, तर ग्रा. पं. सदस्यत्वासाठी २६ अर्ज

नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्ह्यातील ६६ ग्रामपंचायतीतील ७० सदस्य आणि ९ सरपंचांच्या रिक्त जागांसाठी रणधुमाळी सुरू झाली आहे. गेल्या चार दिवसात आतापर्यंत सरपंच पदासाठी २३ तर ग्रामपंचायत सदस्यत्वासाठी २६ अर्ज दाखल झाले आहेत. सोमवारी (दि. १३) अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.
प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, नंदुरबार जिल्ह्यातील ६६ ग्रामपंचायतींमध्ये सदस्यांच्या ७०, तर सरपंचांच्या ९ जागा रिक्त आहेत. या रिक्त जागांसाठी ३० मार्चपासून निवडणूक प्रक्रियेच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली असून, २८ एप्रिल रोजी मतदान तर २९ एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे.
रिक्त जागांसाठी होणाऱ्या या पोटनिवडणुकीसाठी ७ एप्रिलपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली. मात्र पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नव्हता. त्यानंतर ८ ते १० एप्रिल या तीन दिवसात सरपंच पदांसाठी २३ तर सदस्य पदांसाठी २६ अर्ज दाखल झाले.
सोमवारी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून, दाखल अर्जांची १५ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता छाननी होईल. १७ एप्रिलला दुपारी तीन वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची मुदत असेल. यानंतर निवडणुकीच्या रिंगणात उरणाऱ्या उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप होईल, अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.



